दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली, साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांचा केला खुन, तिसरा गंभीर जखमी
आहील्यानगर: दुहेरी हत्याकांडाने शिर्डीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघा जणांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये शिर्डीच्या साई संस्थानच्याच दोघा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सुभाष घोडे आणि नितीन शेजुळ अशी मृतांची नावे आहेत.
साई संस्थानचे दोघे कर्मचारी आणि शिर्डीतील एका तरुणावर ड्युटीला येताना प्राणघातक हल्ला करण्यात आला. तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूने वार करण्यात आले. यापैकी साई संस्थानच्या दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर कृष्णा देहरकर नावाचा तरुण गंभीर जखमी अवस्थेत आहे.
दोघे साई संस्थान कर्मचारी पहाटे ड्युटीला येत असताना या घटना घडल्या. पहाटेच्या सुमारास ड्युटीवर जाताना तिघांवर अज्ञातांकडून चाकूने वार करण्यात आले. तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर वार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. साई संस्थानच्याच दोघा कर्मचाऱ्यांची एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी हत्या होणं हा योगायोग आहे की यामागे काही कारण आहे, हे अद्याप अस्पष्ट आहे.
दरम्यान, शिर्डीत एकाच रात्रीत तिघांवर चाकूने वार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिर्डीत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याची चर्चा होत आहे. पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिर्डीत गुन्हेगारीने डोकं वर काढलेलं बघायला मिळत आहे. त्याचीच परिणीती आज बघायला मिळाली आहे. साई संस्थानचे २ कर्मचारी पहाटे ड्यूटीवर जात असताना त्यांच्यावर वेगवेगळ्या भागांमध्ये प्राणघातक हल्ला झाला. या घटनांचे सिसिटीव्ही फुटेज देखील मिळाले आहेत. दरम्यान, या प्रकाराने शिर्डीत खळबळ उडाली आहे. सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी शिर्डीत दाखल झालेले आहेत. तसच माजी खासदार सुजय विखे पाटील हे देखील तातडीने शिर्डीत दाखल झालेले आहेत.
कोणावर झाला हल्ला?
1)सुभाष साहेबराव घोडे, साई संस्थान कर्मचारी, घटना घडली कर्डोबा नगर चौक
2) नितीन कुष्णा शेजुळ, साई संस्थान कर्मचारी, घटना घडली साकुरी शिव
3) गंभीर जखमी – कृष्णा देहरकर रा. श्रीकृष्णानगर यांच्यावर उपचार सुरू
सुजय विखे यांची प्रतिक्रिया
तीन वेगवेगळ्या ठिकाणी घटना घडल्या आहेत, पहाटे चार वाजताच्या सुमारास घटना घडल्याने फार लोक जागे नव्हते. दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळले आहेत, तर तिसऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोफत अन्नछत्र, मोफत शिर्डी करून ठेवली आहे, त्यामुळे गुन्हेगारी वाढली आहे. पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आम्ही जे बोललो होतो, ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो ते महाराष्ट्राला कळेल, असं माजी खासदार सुजय विखे म्हणाले.
हे ठरवून केलेले मर्डर वाटत नाहीत नशेमध्ये होत असलेले रँडम मर्डर आहेत. व्हाईटनरची नशा करतात ती ही मुलं असावीत. वेगवेगळ्या लोकेशनला जो सापडला त्याच्यावर हल्ला करुन त्याच्याकडून पैसे काढण्याचं हे कृत्य आहे. यात जातपातीचा विषय नाही. हे नशेखोरांचे कृत्य आहे. दुपारपर्यंत हे आरोपी ताब्यात असतील. साडेपाचला पोलिस कर्मचाऱ्यांना फोन केला, त्या कर्माचाऱ्याने तो अपघात असल्याचं सांगितलं, त्याला सस्पेंड केलं जाईल. त्याला मर्डर आणि अपघातातला फरक कळत नाही. सीसीटीव्ही तपासू, ज्या पोलिसांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर कारवाई होईल. आज तपास यंत्रणेला वेळ द्यावा, असंही सुजय विखे म्हणाले. आता अँक्शन मोडवर काम करावे लागेल. प्रसादालयातील मोफत जेवण बंद करावे लागेल. आम्ही ते करून घेणार, सर्वांनी एकत्र यावे लागेल, असेही ते पुढे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here