जामखेड प्रतिनिधी दि.१७

भाजपा युती सरकारच्या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत ५ कोटी ६ लाख २७ हजार रूपये खर्चाची जामखेड शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ दिवंगत मुंडे यांच्या हस्ते झाला होता.मात्र ही पाणीपुरवठा योजनाही नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने रद्द केल्या. तालुक्यातील खर्डा तसेच अन्य विविध गावांच्या २७ कोटीच्या योजना रद्द करण्याचे पाप राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने केले.

जामखेड शहराला वरदान ठरलेला भूतवडा तलावासह जोड तलाव पंधरा दिवसापुर्वी पुर्ण क्षमतेने भरला आहे. या जोड तलाव पाण्याचे जलपुजन माजीमंत्री प्रा.शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१७) झाले .यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रा.शिंदे म्हणाले , महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातर्गत ३ कोटी २२ लाख रूपये खर्चाच्या भूतवडा जोड तलावाच्या कामाचा शुभारंभ ६ मे १९९९ रोजी तत्कालिन उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे यांच्या हस्ते झाला. मात्र राज्यात सत्तांतरानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने नंतर १५ वर्षात या तलावाच्या कामाला निधीच दिला नसल्याने हे काम अपुर्ण राहिले.मात्र २०१४ ला मंत्री झाल्यानंतर आपण या तलावाच्या कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता घेत निधी मिळवून जोड तलावाचे काम पुर्ण केले.यामाध्यमातून जूना भूतवडा तलावाची उंची वाढविण्याबरोबर जोड तलावामुळे तलावाची साठवण क्षमता दिडपटने वाढण्यास मदत झाली.

भूतवडा जोड तलावाबरोबरच खर्डा परिसरातील १ कोटी ६८ लाख ३६ हजार रूपये खर्चाच्या अमृतलिंग लघु पाटबंधारे तलावाच्या कामाचा शुभारंभ दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या हस्ते झाला होता. मात्र याही तलावाच्या कामाला नंतर १५ वर्ष निधी मिळाला नाही.१५ वर्षानंतर राज्यात भाजपा सरकार आल्यानंतर आपण या कामाला निधी मिळवून काम पुर्ण केले असल्याचे प्रा.शिंदे यांनी सांगितले.

जामखेड शहरासाठी उजनीवरून पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी आपण पाठपुरावा करून योजना मंजूर करून घेतली.मात्र याचे श्रेय मला मिळेल म्हणून,विद्यमान लोकप्रतिनिधींनी तब्बल दोन वर्ष ही योजना प्रलंबीत ठेवली.ही योजना दोन वर्ष प्रलंबीत का ठेवली ? याचे उत्तर लोकप्रतिनिधींनी देणे गरजेचे आहे. मात्र याचे उत्तर देण्याचे ते सोईस्कर टाळत आहेत.

जामखेडला कुकडीचे पाणी मागितल्यानंतर कुकडी प्रकल्पातील पाण्याचे नियोजन झाल्याने पाणी देता येत नसल्याचे तत्कालिन पाटबंधारेमंत्री अजित पवार यांनी सांगून, पाणी देण्याचे टाळले आहे.मात्र आपल्या मंत्री पदाच्या काळात कर्जत तालुक्यातील तुकाई उपसा सिंचन योजना आणि जामखेड तालुक्यातील जवळा आणि आगी बंधा-याचा कुकडी लाभक्षेत्रात समावेश करून , कर्जत जामखेड तालुक्याला हक्काचे कुकडीचे पाणी मिळवले.त्याचबरोबर कुकडी प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता घेतली.

आज विद्यमान लोकप्रतिनिधींनी तुकाई उपसा सिंचन योजना गुंडाळुन ठेवली आहे.तर कुकडीचे आर्वतण पाण्यासाठी कर्जत तालुका कायम आसुसलेला ठेवला आहे.जवळा ,आगी बंधा-यात अद्यापही कुकडीचे पाणी आलेले नाही.

कर्जत जामखेडला पाण्याच्या प्रश्रासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कायम सापत्नभावाची वागणूक मिळालेली आहे . हा इतिहास साक्षीदार आहे. त्यामुळे याप्रश्रावर विद्यमान लोकप्रतिनिधीला बोलण्याचा कसलाही नैतिक अधिकार नसल्याने ते याप्रश्री स्वतः बोलायला टाळत आहेत अशी टीका माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी आ. रोहित पवार यांचे नाव न घेता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here